शनिवार, १६ ऑक्टोबर, २०२१

मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड : महेश एलकुंचवार

 



नाटक हे कितीही खोटे असले, तरी त्यावर येणारे विषय हे वास्तवातले असतात. काल्पनिकतेला सत्याचा आभास निर्माण करण्याची जी क्षमता लेखकांकडे असते, त्यात महेश एलकुंचवार यांची नाटके ही अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणूनच मराठी रंगभूमीवर एलकुंचवार यांची नाटके एक मैलाचा दगड ठरली आहेत. मैलाचा दगड म्हणजे नवे वळण, टप्पा दाखवणारे परिमाण असते. रंगभूमीवर त्यांनी असेच एक परिमाण निर्माण केले.

एकूणच भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार महेश एलकुंचवार यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाट्य लेखनात केलेले आहेत. ज्यात वास्तववादी, प्रतिकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत त्यांनी रचना केलेल्या आहेत. सर्जनशीलता ही त्यांच्याकडे उपजत आहेच, पण जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जन्म ते मृत्यू यांसारख्या विविध विषयांना त्यांनी नाट्यमयपणे गुंफून त्यांनी अनेक कलाकृती पुढे आणल्या. तब्बल चार दशकांहून अधिक काळ आधुनिक भारतीय रंगमंचावर त्यांचा प्रभाव आहे.


१९६७ मध्ये सत्यकथा या मासिकात सुलतान या त्यांच्या एकांकिकेच्या प्रकाशनानंतर महेश एलकुंचवार नाट्यसृष्टीत प्रकाशझोतात आले. प्रसिद्ध दिग्दर्शक विजया मेहता यांनी एलकुंचवार यांची नाट्यकृती रंगमंचावर आणली. १९६९ आणि १९७० मध्ये होळी आणि सुलतान यांच्यासह रंगायनसाठी त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले. महेश एलकुंचवार यांच्या नाटकांवर आधारित होली, रक्तपुष्प, पार्टी, विरासत अशा अनेक व्यावसायिक चित्रपटांनंतर यश मिळाले. महेश एलकुंचवार यांच्या नाटकांचे अनेक भारतीय आणि पाश्चात्य भाषांमध्ये भाषांतर केले गेले. त्यामुळेच त्यांची नाटके आणि त्याचेविषय महत्त्वाचे आहेत. परकीय भाषांमधील नाटके मराठीत आणण्यापेक्षा मराठी कल्पना बाहेरच्या भाषांनी स्वीकारणे हे फार महत्त्वाचे आहे. मराठी रंगभूमीला ते वरदायी असे आहे.

१९८४ मध्ये त्यांच्या होळी या नाटकावर केतन मेहता यांनी होली या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी महेश एलकुंचवार यांनी पटकथा लिहिली होती. त्याच वर्षी गोविंद निहलानी यांनी महेश एलकुंचवार यांच्या पार्टी नावाच्या नाटकावर आधारित पार्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोनाटा या एलकुंचवार यांच्या अभिजात नाटकावर आधारित चित्रपटात अपर्णा सेन, शबाना आझमी आणि ललित दुबे यांनी भूमिका साकारल्या आहेत. महेश एलकुंचवार यांची नाट्यसृष्टी भारतीय रंगभूमीवरील महान दस्तऐवज आहे.


महेश एलकुंचवार हे मुळचे विदर्भातील. त्यांचा जन्म विदर्भातील परवा गावात स्थलांतरित तेलगू ब्राह्मण कुटुंबात झाला. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी आपले आई-वडील आणि जन्मगाव सोडून दिले. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मॉरिस महाविद्यालयात आणि पदवीतर शिक्षण इंग्रजी साहित्यात नागपूर विद्यापीठातून झाले. हे मराठीतील साठोत्तर कालखंडातील एक महत्त्वाचे नाटककार आहेत. त्यांच्या वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगान्त या तीन नाटकांचा मिळून मराठी रंगभूमीवर झालेला सलग दीर्घ रंगमंचीय प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण ठरला असून, तो त्रिनाट्यधारा म्हणून ओळखला जातो.

महेश एलकुंचवारांच्या वाडा चिरेबंदी या नाटकाचा इंग्रजी भाषेमध्ये द ओल्ड स्टोन मॅन्शन नावाने अनुवाद करण्यात आला आहे. मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार महेश एलकुंचवार यांची वाडा चिरेबंदी ही नाट्यकृती प्रसिद्ध आहे. वाडा चिरेबंदी नाटकाचे आतापर्यंत व्यावसायिक रंगभूमीवर शेकडो प्रयोग झाले असून, मग्न तळ्याकाठी नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. साधारण चार-पाच वर्षांपूर्वी चंद्रकांत कुलकणी यांनी या नाटकाचे पुनरूज्जीवन केले होते. त्यालाही चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. यात निवेदिता जोशी-सराफ, प्रसाद ओक, वैभव मांगले, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर असे तगडे कलाकार या नाटकामध्ये काम करत होते. या नाटकाचे दिग्दर्शन प्रतिथयश रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. जुन्या वाड्यातील एकत्र कुटुंबात राहणाºया एखाद्या ज्येष्ठाचा मृत्यू झाल्यानंतर सगळे वारसदार जमतात. यात मुंबईतील स्थायीक मुलगा आपल्या कुटुंबासह येतो. गावाकडचे जीवन, शेती करणारा मोठा भाऊ, दुर्लक्षित पडेल ते काम करणारा धाकटा भाऊ, एखादी पडीक म्हातारी, यातून कौटुंबिक टोमणे, गावाकडच्यांना आकर्षित करणारे मुंबईचे जीवन आणि तडजोडी करत जगणारा, डोलारा सांभाळणारे मुंबईतील स्थायीक असे गावागावांत दिसणारे, घडणारे कथानक या नाटकात दिसते. त्यामुळे ते प्रत्येकाला जवळचे वाटते. हा वाडा, त्याबद्दलचे प्रेम, त्याची खोली, भयावहपणा हे सगळे तीन तास टेन्शनमध्ये ठेवते. प्रत्येकजण ते नाटक पाहताना या वाड्यातून मनाने फिरून येतो असा आभास या नाटकामुळे होतो हे एलकुंचवार यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. काही दशकांपूर्वी विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक पुन्हा नव्याने आणण्याचे फार मोठे धाडस चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले होते, पण हे नाटक तेव्हा पाहताना आणि आजही पाहताना तितकेच खिळवून ठेवते. हे नाटक पाहताना आनंद मिळत नाही, कारण यातील कथानक आपल्या जवळपास कुठेतरी घडताना दिसते. त्यामुळे पिळवटून टाकते. पण हा पिळवटलेपणा दाखवण्यासाठी कलाकारांनी घेतलेली मेहनत आणि त्यांना नैसर्गिक अभिनय करण्याची मिळालेली संधी हे फार महत्त्वाचे आहे. अशा नैसर्गिक अभिनयाची संधी देणारे नाटककार म्हणून एलकुंचवार यांच्या या नाटकाचा उल्लेख करावा लागेल.


वाडा चिरेबंदीतील व्यक्तिरेखांचे दहा वर्षांनंतर नेमके काय होते असा विचार एलकुंचवार यांच्या मनात आला. समाज बदलतो तशी मूल्यं बदलतात. पिढी बदलते तसे नातेसंबंधही बदलतात. हे ध्यानात घेऊन प्रकाश टाकण्याच्या उद्देशातून वाडाचा दुसरा भाग म्हणून एलकुंचवारांनी मग्न तळ्याकाठी नाटकाचे लेखन केले. हे पण अत्यंत भेदक असे वाटते. इथे त्यांच्या विचाराची खोली दिसून येते.

याशिवाय रुद्रवर्षा, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, आत्मकथा, प्रतिबिंब, मग्न तळ्याकाठी, युगान्त, गार्बो, सोनाटा, एका नटाचा मृत्यू ही एलकुंचवारांची नाटके आहेत. आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत, तर यांतील काही नाटकांचे बंगाली व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाले आहेत.


महेश एलकुंचवार यांच्या होळी या एकांकीकेने कॉलेज जीवनातील, हॉस्टेलवरचे रॅगिंग आणि दंगा हा प्रकार दाखवला आहे. रॅगिंगमुळे एक मुलगा हॉस्टेलवर आत्महत्या करतो. त्याला सीनिअर कसे छळतात हे वास्तववादी चित्रण यातून दाखवले आहे. ही एकांकिकाही स्पर्धेतून तुफान गाजली.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा


9152448055\\


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: