लंकादहन करायचे असल्यास काही बिभीषण निश्चितच आवश्यक असतात, असे विधान भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस हे प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा भरल्यामुळे ते आता बेजबाबदार विधाने करू लागले आहेत असे वाटते. एकंदरीतच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कसला तरी गर्व झालेला आहे असे वाटते. त्यामुळे त्यांच्यात उर्मटपणा प्रचंड वाढलेला दिसून येतो आहे. चार दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची एबीपी माझा च्या कट्टावर जी मुलाखत होती त्यामध्ये त्यांच्यातील गुर्मी ही अत्यंत हिडीस वाटत होती. तोच प्रकार सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्यात वाटत होता. एक संयमी आणि नेमके बोलणारा नेता अत्यंत बेजबाबदार विधाने करताना दिसत होता. परंतु नकळत ते खरे बोलून गेेले. आपण नको त्या लोकांना पक्षात घेतल्याबद्दल त्यांना पश्चाताप ्रझाला असावा असेच दिसून येते. लंकादहन करण्यासाठी बिभिषण हवेत याचा अर्थ राक्षसी वृत्तीचे लोक आपल्या पक्षात आले आहेत हे त्यांनी कबूल केले हे लक्षात घेतले पाहिजे.पण या भाजपच्या लोकांनी रामाचे जरी भांडवल केले असले तरी त्यांना खरे रामायण समजलेच नाही हे लक्षात घेतले पाहिजे. लंकादहन हे हनुमानाने केले होते आणि त्यानंतर कैक दिवसांनी बिभिषणाची रामाशी मैत्री झाली. बिभिषणाला रामाने आसरा दिला तरी तो केवळ लंकाधिश म्हणूनच आसरा दिला. रावणाशी युद्ध सुरू करण्यापूर्वी रावणाला चिडवण्यासाठी बिभिषणाला राज्याभिषेक करण्याचा संकल्प रामाने सोडला. रावणवधानंतर मानवाच्या आणि राक्षसांच्या मर्यादा लक्षात घेवून बिभिषणाची इच्छा असूनही बिभिषणाला अयोध्येत राहण्यास रामाने परवानगी दिली नाही. तुमची जागा लंकेत आहे असे सांगून सर्व राक्षसांना परत पाठवले. पण हे भाजपचे लोक त्या रामायणाचा खोटा संदर्भ घेवून बिभिषणाला कायमस्वरूपी आपल्यात घेत आहेत. पराभव करण्यासाठी काही फितुर मिळवणे आणि नंतर त्या फितुरांना इनाम देवून परत त्यांच्या गावात परत पाठवणे ही राजनीती आहे. मग नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काँग्रेसमधील राक्षसांना आपल्यात घेतले आहे त्यांना नंतर कुठे फेकून देणार? हे जे काँग्रेसमधून आलेले भ्रष्ट नेते आज भाजपच्या तिकीटावर निवडणुका लढवत आहेत त्यांना नंतर कुठे अडगळीत टाकणार ते जरा स्पष्ट केले तर फार बरे होईल. खरे तर देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती अभ्यासू म्हणून प्रसिद्ध आहे. विरोधकांवर कागदपत्रांच्या आधारे टीका करणे हा त्यांचा गुण आहे. त्याला व्यक्तिगत स्वच्छ चारित्र्याची जोड मिळाली होती. यामुळेच सरकारविरोधातील त्यांच्या कडव्या मार्याला विश्वासार्हता मिळाली. अन्य नेत्यांबद्दल तोडपाण्याच्या गोष्टी बोलल्या जात असताना फडणवीस हे त्यांच्या स्वच्छ वागणुकीमुळे उठून दिसायचे. अशा फडणवीसांना पक्षासाठी असली उथळ विधाने करायची वेळ यावी याहून दुर्दैवी परिस्थिती नाही. याला नैतिक अध:पतन म्हणतात. नितीमत्तेचा र्हास होवू लागला की माणूस बरळू लागतो. नको त्या लोकांना आपल्या पक्षात घेवून जो भाजप भ्रष्ट केला आहे त्यामुळे फडणवीसांचे संतुलन जात आहे असे वाटते. त्यामुळे छछोर आणि चुकीची विधाने ते करू लागले आहेत. रामायणाचे चुकीचे संदर्भ देवून स्वत:च अडचणीत येत आहेत. फडणवीसांनी ज्यांच्याकडून राजकारणाची मुळाक्षरे गिरवली ते नितीन गडकरी अशी विधाने करण्यात प्रसिद्ध आहेत. गडकरी काहीही बोलतात आणि वेळ मारून नेतात. पनवेलला काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेताना राम ठाकूर यांना आता ते योग्य ठिकाणी आले आहेत असे सांगताना इतके दिवस रावणाकडे होता आता खर्या रामाकडे आला आहात असे सांगितले. रामशेठ खूष झाले पण रावणाकडे बिभिषण होता. त्यामुळे आपल्याला राम म्हटले असे जरी त्यांना वाटत असले तरी घरचा भेदी बिभिषण असेच नितीन गडकरी यांनी त्यांना संबोधले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर या बिभिषणाला कुठे अडगळीत टाकतील याचा नेम नाही. पण नितीन गडकरींची वाक्ये नेहमीच दादा कोंडके सारखी द्वयर्थी असतात. त्याचा सोयीस्कर अर्थ नंतर ते लावतात. पण देवेंद्र फडणवीसांकडून तसे अपेक्षित नाही. उपयुक्तता या एकमेव निकषावर गडकरींचे राजकारण चालते. त्यांच्या असल्या युक्तिवादाकडे जनता गंभीरपणे पाहत नाही. फडणवीस यांचे तसे नाही व ज्यांच्या जिवावर ते मते मागणार आहेत, त्या मोदींनीही असले युक्तिवाद केलेले नाहीत. परंतु सध्या भाजपचा सगळा कारभार विपरीत पद्धतीने चालू असल्याने कुठे काय बोलावे हे नेत्यांना समजत नाही असे झाले आहे. लोकसभा निवडणुकीतील मतांची संख्या पाहता खरे तर शत-प्रतिशत भाजप ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याची संधी स्थानिक नेत्यांना होती. पण आता लढून मिळवले ते बोलून घालवले अशी अवस्था या नेत्यांवर येणार आहे.नितीन गडकरींनीच एका मुलाखतीत बोलताना कोणत्याही गोष्टीची एक ठराविक जागा असते. हे बिंबवण्यासाठी सांगितले की अगदी नवे कोरे स्वच्छ असे बेडपॅन असले तरी त्याच्यात कोणी श्रीखंड ठेवेल काय? असा युक्तीवाद केला होता. त्याचा अर्थ असा निघतो की आज केवळ पैसा खर्च करू शकेल म्हणून आणि काँग्रेसची एक जागा कमी होईल म्हणून त्यांनी प्रशांत ठाकूर यांना आपल्यात घेतले आहे. नंतर त्यांची जागा बेडपॅनसारखीच होईल. बेडपॅनच्या मुखात कधी श्रीखंड पडत नसते हे गडकरीच या संधीसाधूंना दाखवून देतील. खरे तर आज भाजपची अवस्था या नागपूरी संत्र्यासारखी झालेली आहे. वरचे साल काढले की सगळ्या फोडी अलग होतात. आज मोदी नावाचे कवच घेवून हे सगळे नेते उड्या मारत असले तरी प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचे तोंड वेगळे आहे. गडकरी, फडणवीस, खडसे आणि विनोद तावडे यांची चार दिशांना तोंडे आहेत. प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत. पण स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे राज्यातील नेते एकजुटीने उभे राहिले असते व युती तोडण्याचा निर्णय महिनाभरापूर्वीच घेतला असता तर चित्र वेगळे दिसले असते. पण आता भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी मतदारच तयार झालेला आहे. काँग्रेसच्याच लोकांना भाजपमध्ये घ्यायचे होते तर नरेंद्र मोदींनी दिल्लीत विधानसभेत भाजपचे सरकार का स्थापन केले नाही. आम आदमी पार्टीला लांब ठेवण्यासाठी काँग्रेसच्या चार आमदारांचा पाठिंबा ते मिळवू शकले असते. पण मोदींनी तसे केले नाही. पण महाराष्ट्रातील भ्रष्ट भाजपचे नेते मात्र काँग्रेसजनांनाच कुरवाळत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे.कदाचित मोदींच्या करिश्म्यावर भाजपचाच विश्वास नसावा अशा रीतीने पावले पडत गेली. अन्यथा पाचपुते, गावित अशासारख्यांना पक्षाची दारे उघडी करण्याचा निर्णय घेतला गेला नसता. राजकीय व्यूहनीती म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतात असाही युक्तिवाद फडणवीस यांनी केला आहे. परंतु यातून भाजपची अगतिकता किंवा सत्तेसाठीची व्याकूळता फक्त दिसते. यामध्ये नीती कोणतीही नाही. लोकसभा निवडणुकीनंतर जे वेगळे वारे राज्यात वाहू लागले होते, जनतेमध्ये निवडणुकीबद्दल उत्साह होता; पण नेत्यांच्या अशा वागण्यामुळे तो कमी झाला आहे.बिभीषणाची उपमा देताना फडणवीस यांची गल्लत झाली असे म्हणावे लागते. रामायणातील त्या घटनेचा असा उपयोग निदान फडणवीस यांच्याकडून अपेक्षित नव्हता. रामायणातील युद्ध मुळात एका तत्त्वासाठी होते. ते अन्यायाविरुद्ध होते. तत्त्व शुद्ध असल्यामुळे बिभीषणाचे वर्तन फितुरीत गणले गेले नाही. रामाकडून वालीचा झालेला वध ही फसवणूक होती असे सकृतदर्शनी वाटले तरी त्यामागचा मूळ हेतू शुद्ध असल्याने तो वधही रामासाठी पापाचरण मानले गेले नाही. इथे भाजप कसले तत्त्वाचे राजकारण करीत आहे? कोणत्या तत्त्वासाठी पाचपुते वा गावित, प्रशांत ठाकूर अशांना पक्षात आणले? इथे तत्त्व फक्त सत्ता मिळवणे इतकेच आहे. तत्त्वशून्य राजकारणासाठी बिभीषणाला वेठीस धरणे हे हिंदुत्व मानणार्यांना तरी शोभत नाही. फडणवीस ज्यांचा गौरव करतात ते बिभीषणाचे वंशज नसून संधीसाधू आहे. सत्तेसाठी वाट्टेल ते करू या एकमेव उद्देशाने सर्वकाही चालू आहे. निव्वळ राजकीय स्वार्थ यापलीकडे त्यामागे काहीही नाही. पण मुंडे महाजनांनंतर महाराष्ट्रातील भाजपची गडकरी, फडणवीस, तावडे, खडसे या चौकडीने वाट लावली. विश्वास उडवला हे निश्चित. भाजप म्हणजे काँग्रेसचीच दुसरी शाखा आहे. संघाच्या शाखेतून बाहेर पडत काँग्रेसची नवी शाखा काढण्याचे काम भाजपने केले आहे.
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०१४
संघाच्या शाखेला तिलांजली देवून भाजपने काढली काँग्रेसची शाखा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा