सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

रावणाशी हातमिळवणी करून भाजपच्या रामाने वानरसेनेचा घात केला


जनतेच्या मनातील विश्‍वास गमावून भारतीय जनता पक्ष आता असूयेने सत्ता प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप हा सर्वसामान्यांच्या मनातून उतरत आहे. शिवसेनेची युती तोडल्यानंतर आता  शिवसेनेशी घरभेदीपणा करण्याचा जो प्रकार भाजपकडून होत आहे तो अत्यंत हिडीस आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या सत्तेपासून आता रोखावेच लागेल.ज्यांना नाकारायचे त्या काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक भ्रष्ट आणि निष्क्रिय नेत्यांना तिकीटे दिल्यानंतर शिवसेनेनेच्या काही नेत्यांना फोडण्याचा जो प्रकार भाजपने केलेला आहे तो अत्यंत संतापजनक आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जायचे ही नीती अत्यंत वाईट आहे. निवडणुका या जिंकण्यासाठी लढायच्या आहेत हा जो भाजपने नवा फॉर्म्युला आणला आहे तो नीतीमत्तेला काळीमा फासणारा आहे. निवडणुका जिंकण्यासाठी चारित्र्यहीन नेत्यांनाही आपल्याकडे ओढायचे, काँग्रेसच्या लोकांनाही आपले लेबल लावून उमेदवारी द्यायची, निवडून येण्याचा निकष लावून उमेदवारी द्यायची, पैसा खर्च करू शकेल अशा शेठजींना आपल्या पक्षात घ्यायचे हा भाजपचा सध्याचा विचार म्हणजे लोकशाहीला लागलेला कलंक म्हणावा लागेल.महाराष्ट्रात शिवसेनेला खर्‍या अर्थाने सर्वात प्रथम साथ दिली ती ठाणे जिल्ह्याने. या ठाण्यातील एकेका नेत्यांना आपल्याकडे ओढून शिवसेनेची घरफोडी करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. हा प्रकार अतिशय वेदनादायी असाच आहे. शिवसेनेत दीर्घकाळ असलेले कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले, माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांना भारतीय जनता पक्षाने बंडखोरी करायला भाग पाडून भाजपतर्फे उमेदवारी दिली. युती तोडली ती तोडलीच पण आपल्या 25 वर्ष असलेल्या मित्राला संपवायचा चालवलेला हा प्रयत्न भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेने विजय चौगुले यांना उमेदवारी दिल्यामुळे वैभव नाईक यांना बंडखोरी करण्यास भारतीय जनता पक्षाने प्रोत्साहन दिले आणि भाजपच्या तिकीटावर उभे केले. याचा फायदा ना शिवसेनेला होणार ना भजपला होणार. त्याचा फायदा विरोधकांना होणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला होणार आहे हे भाजपने का लक्षात घेतले नाही?पुणे जिल्ह्यातही भोर मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार ढमाले यांना बंडखोरीला प्रोत्साहन देवून भाजपने उमेदवारी दिली. भारतीय जनता पक्ष आपला खरा शत्रू हा काँग्रेस आहे हे सोडून शिवसेनेला लक्ष करण्याचे ठरवले आहे काय ? किती दुर्दैवी गोष्ट आहे ही? केवळ शिवसेनेला हटवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी सरसकट कोणालाही आपल्याकडे घेण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत असेल तर मतदार या भाजपला साथ देणार नाहीत. हा भारतीय जनता पक्ष किमान महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयींचा भाजप नाही. हा भाजप नरेंद्र मोदींचा भाजप नाही. हा भाजप मुंडे महाजनांचा भाजप नाही. तर हा काँग्रेसाळलेला भाजप आहे. खोटेपणाचे तंत्र विकसीत करून, इंग्रजांच्या फोडा आणि झोडा या विचाराचा प्रसार करणारा हा भाजप आहे. त्यामुळे अशा भाजपला आता नाकारावेच लागेल.काँग्रेसच्याच लोकांना आपल्याकडे घेवून, अन्य पक्षांचे नेते आपल्याकडे ओढून बहुमत मिळवू पाहणार्‍या भाजपकडे कसला विचार असणार आहे? प्रशांत ठाकूर यांची निष्क्रियता, खोटेपणा याला गेली पाच वर्ष मतदार कंटाळले होते. केवळ स्वार्थासाठी पक्षाचा आणि सत्तेचा वापर करायचा आणि जनतेकडे दुर्लक्ष करण्याच्या त्यांच्या धोरणाला पनवेलकर वैतागले होते. त्याच प्रशांत ठाकूर यांना भारतीय जनता पक्ष तिकीट देत असेल तर हा भाजप नाही हे काँग्रेसचेच नवे रूप आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे ओढायचे आणि आपला पक्ष मोठा करायचा ही काँग्रेसची गेल्या पन्नास साठ वर्षांपासून असलेली परंपरा. या परंपरेमुळेच एकाधिकारशाही, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला उत आला.महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेस मोठी करण्यासाठी बेरजेचे राजकारण केले. सत्तेच्या माध्यमातून विकासकामे होतील असे आमिष दाखवून वेगवेगळ्या पक्षातील समाजवादी, डाव्या पक्षातील नेत्यांनाही आपल्याकडे ओढले. यामध्ये खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण यांनाही शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये नेले. सहकारमहर्षी म्हणून कराड आणि वाळवा तालुक्यात ख्याती असलेल्या यशवंतराव मोहीते यांना काँग्रेसमध्ये आणले. अशा प्रकारे छोटे छोटे पक्ष संपवून बेरजेचे राजकारण यशवंतरावांनी केले होते. तोच प्रकार नव्याने आता भारतीय जनता पक्ष करताना दिसत आहे. यातून भाजपला स्वत:चा  पक्ष मोठा झालेला आहे हे जगाला दाखवता येईल. पण तो खर्‍या अर्थाने  मोठा झाला आहे काय याचे ते उत्तर मनाला देवू शकणार नाहीत. सत्ता मिळवण्याची ही जी इर्षा भाजपने चालवली आहे ती महाराष्ट्राला, देशाला अत्यंत घातक अशी आहे.भारतीय जनता पक्षाचे मूळचे जे नेते होते त्यामधील ज्येष्ठ असे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी असे अनेक नेते आता भाजपच्या या नव्या पिढीने अडगळीत टाकले आहेत. हा पक्ष आपल्या मूळ अजेंड्यावरून दूर गेला आहे आणि काँग्रेसचीच धोरणे राबवू लागला आहे. हा प्रकार कदापि मतदार सहन करणार नाहीत. कुठे गेले भाजपचे  हिंदुत्ववादी विचार? कुठे सोडले अयोध्येतील रामाला त्यांनी? आता अयोध्येतील रामाला पुन्हा वनवासाला जावे लागणार का? कसा पडला या मुद्यांचा विसर भाजपला? आता रामाच्या नावाखाली असलेले रावण भाजपने आपल्या पोटात घेण्यास सुरूवात केल्यामुळे त्यांनी वानरसेनेला फस्त करण्याचा चंग बांधला आहे. रामायणात रामाचे खरे मित्र होते ते वानर. या वानरसेनेमुळे रामाला सीतेपर्यंत लंकेला पोहोचता आले. पण त्याच रावणाशी हातमिळवणी करून वानरांचा विश्‍वासघात करण्याचे काम भाजपच्या या नव्या रामायणात घडताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील अस्तित्व हे केवळ शिवसेनेमुळे आहे. भाजपला राम मानून शिवसेनेेने वानरसेनेप्रमाणे मैत्री केली. पण तोच भाजप आज त्याच शिवसेनेशी गद्दारी करतो आहे. काँग्रेसमधून आलेल्या भंपक, भ्रष्ट, निष्क्रिय नेत्यांना आपलेसे करून आपल्या जुन्या मित्रांना संपवत आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर महाराष्ट्राला जसा काळीमा लागला होता तसाच काळीमा या युती तोडण्याच्या भाजपच्या कृतीने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील लोकशाहीला लागला आहे. त्यासाठी आता भाजपला नाकारणे हाच पर्याय आहे. मतदारांना ओरिजनल भारतीय जनता पक्ष हवा आहे. हा असा बाटग्यांचा आणि भ्रष्ट नेत्यांच्या आगमनामुळे फुगलेला भाजप नको आहे. असा भाजप अच्छे दिन आणू शकणार नाही. भाजपने मुळात काँग्रेसच्या  नेत्यांना आपल्या पक्षात स्थान देवून फार मोठी चूक केलेली आहे. त्यामुळे ज्या गतीने भाजपला यश मिळाले त्याच्या चौपट गतीने आता भाजपला अपयशाला सामोरे जावे लागेल यात शंकाच नाही. जे नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गडकरी, फडणवीस, तावडे या त्रिकुटाने आणले आहेत ते काँग्रेसमध्ये केंद्रात, राज्यात सत्ता असताना काही करू शकले नव्हते. ते भाजपमध्ये आल्यावर कसे काय काम करतील? मुळात त्यांना भाजपमध्ये रूळायलाच कितीतरी दिवस जातील. तोपर्यंत त्यांनी नवा घरोबा केलेला असेल. त्यामुळे अशा नेत्यांना उमेदवारी देवून आपल्या सच्चा मित्राला गमावण्याचे जे पाप भाजपने केले आहे त्याची किंमत भाजपला मोजावी लागेल. 2008 च्या निवडणुकीत राजस्थानातील सत्ता भाजपला याच धोरणामुळे गमवावी लागली होती. वसुंधरा राजे यांनी त्यावेळी दागी, भ्रष्ट नेत्यांना बाजूला न करता उमेदवारी दिली होती. त्यावेळीच नरेंद्र मोदींनी या गोष्टीला विरोध केला होता. पण मोदींचे न ऐकता, मोदी राजस्थानचे प्रभारी असतानाही त्यांना राजस्थानात हस्तक्षेप करण्यास मज्जाव करून वसुंधरा राजे यांनी ऐकले नाही. त्याचे फळ त्यांना तेव्हा मिळाले. आजही महाराष्ट्रातील युती तोडू नका हे मोदींचे आदेश धुडकावून लावत भाजप नेत्यांनी जो प्रकार केला आहे, त्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रावणाशी हातमिळवणी करून भाजपच्या रामाने वानरसेनेला संपवण्याचा बांधलेला चंग त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. रामाचा बुरखा घातलेला हा रावण आहे हे समोर आल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: