गुरुवार, ९ मार्च, २०१७

डोळस समिक्षक वि.भा. देशपांडे


ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे म्हणजेच विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नाट्यक्षेत्रातील अभ्यासक असले तरी त्यांची नाटकाकडे पाहण्याची दृष्टी फार वेगळी होती. ही दृष्टी फार कमी समिक्षकांना लाभते. त्यामुळेच विभांचे वेगळेपण पाच दशके टिकून राहिले. त्यांच्या कार्याची त्यासाठीच दखल घेणे उचित वाटते.  मराठी माणूस आणि नाटक हे नातंच वेगळं आहे. किंबहुना माणसाच्या अंगात हाडं, रक्त असतं तसंच मराठी माणसाच्या अंगात नाटक भिनलेलं असतं. रक्ताचे जसे वेगवेगळे गृप असतात ए, बी, एबी, ओ तसे मराठी माणसांचे नाट्यगुणांचे वेगळेपण असते. कोणी नट असतो, कोणी प्रेक्षक असतो, तर कोणी समिक्षक असतो. पण नाटकाशी जोडलेला असतो. ओ गटाची माणसे जशी दुर्मिळ आणि वेगळी तशी स्थिती वि.भा. देशपांडे यांची होती. डॉ. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात योगदान देत राहिले. डॉ. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळपास 1200 पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात मोलाची भर टाकली होती. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. नव्या पिढीने त्यांचे मोठेपण जाणले पाहिजे. डॉ. वि.भा. देशपांडे यांची प्रकाशित पुस्तकांची संख्या 50 पेक्षाही  अधिक असेल.  यातील  ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले ’, ‘॥ नाट्यभ्रमणगाथा ॥’ , ‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’ , ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.  प्रत्येक हौशी आणि व्यावसायिक रंगकर्मींने ही पुस्तके वाचली पाहिजेत. नाटकातील माणसं या पुस्तकातून त्यांनी जे  काही वर्णन, किस्से टिपले आहेत ते अंतर्मुख करायला लावणारे आहेत. साधारण 1970 ते 1990 हा काळ हौशी कलाकारांमधील कौटुंबिक वादाचा काळ होता. कारण तेंव्हा नाटकात काम करणं, त्यात करीअर करणं हे प्रतिष्ठेचं मानलं जात नव्हतं. त्यामुळे या महाराष्ट्राने अनेक चांगले कलाकार गमावले आहेत. नाटक हे हौसेपुरतं करा चरितार्थासाठी नोकरी करा असा विचार सगळीकडं डोकावत होता. त्यामुळे नाटकातली माणसं हे पुस्तक फार महत्वाचं वाटतं.   नाटक, साहित्य, संगीत या गोष्टींवर नितांत प्रेम करणार्‍या वि भा देशपांडे यांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेले अनुभव म्हणजेच त्यांचे पुस्तक ‘नाट्यभ्रमणगाथा’. नाट्य-साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांना जवळून पाहता आले. अनेकांशी त्यांचा स्नेह, मैत्र जुळले. त्यांचे अनुभव वि.भां. नी या गाथेतून टिपले आहेत.   
वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशी अनेक मंडळी त्यांना भेटली. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये वि. भा. देशपांडे यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत आणि स्पष्टपणे लिहिली आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंगही त्यांनी यातून उलगडले आहेत. उत्कृष्ट संपादनासाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचसोबत त्यांना नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु पुरस्कारांनी सन्मानीत करण्यापेक्षाही वि.भा.देशपांडे यांचे मोठेपण अधिक होतं. त्यांच्याकडून शिकणं, नाटक जाणून घेणं हे फार मोठं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यप्रवेश, एकपात्री स्पर्धा आयोजित केल्या जातात. तेंव्हा हौशी रंगकर्मींना ऐनवेळी कोणते प्रवेश हुडकायचे? त्यासाठी असंख्य नाटके वाचायला पाहिजेत. पण वि. भा. देशपांडे यांनी अशा प्रवेशांचे पुस्तक तयार केल्याने रंगकर्मींवर फार उपकार केले होते. त्यामध्ये ऐतिहासीक, पौराणिक, सामाजिक असे वेगळे भाग करून रंगकर्मींचे काम फार सोपे केले होते. समिक्षक आहोत म्हणजे केवळ टिकाच केली पाहिजे असा अनेकांचा समज असतो. पण चांगल्याचे कौतुक करण्याचे मोठे मनही त्यांच्यात होते. समिक्षक हा काही सर्वज्ञ नव्हे. त्याचा फक्त दृष्टीकोन आहे, हे ते ठामपणे सांगत, म्हणूनच ते एक डोळस समिक्षक होते. रंगकर्मींच्या उणिवा स्पष्टपणे सांगणारा, त्यांनी काय केलं पाहिजे हे मोकळेपणाने सांगणारे आणि रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे वि. भा. देशपांडे. त्यांच्या जाण्याने खरंच एक उणिव नाट्यक्षेत्रात निर्माण झालेली आहे. त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली.  - प्रफुल्ल फडके   8108454555  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: