शुक्रवार, २४ मार्च, २०१७

इथेही अनेकांना वाव आहे

     उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील संत, महंतांमध्ये, धर्म, पंथांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. भविष्यात आपणही या राज्याचे मुख्यमंत्री, गेला बाजार खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष होवू शकतो अशी स्वप्नं आता संन्याशांना पडू लागली आहेत.
      योगी आदित्यनाथ यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतेक मठ, आश्रम, मठी, देवालये, देवस्थानं यातून चैतन्याचे वारे वाहू लागले आहे. यावर्षींच्या गुढी पाडवा स्वागत यात्रेत याचे चित्र उमटले तर आश्चर्य वाटायला नको.
     तसे महाराष्ट्रात बुवा, बापू यांना तोटा कधीच नव्हता. प्रत्येकाचे एकेक संस्थान आहे. विरार ते ठाणे एक संस्थान. या संस्थानचे लोक लोकलमध्येही नामस्मरण करत असतात आणि वह्यांमध्ये नामलेखन करत असतात. नंतर त्यांच्या श्रेष्ठींच्या चरणी त्या वह्या अर्पण करून पुण्यप्राप्त करतात. यांचे मोठे प्रस्त आहे. अनेकवेळा या बापूंचे स्वयंसेवक गणेशोत्सव, नवरात्रात स्वयंसेवकगिरी करून सामान्य माणसांचा आशीर्वादही प्राप्त करतात. त्यामुळे या बापूंचा ‘हात’ सतत वर असल्याने काँग्रेसमधून त्यांना संधी आहे. भविष्यात त्यांना संधी असली तरी हा आशीर्वादाचा हात कोणाच्या माथी पडतो यावरून त्यांना संधी मिळू शकेल. त्यामुळे भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. म्हणजे बापूंचे भक्त आणि नमोंचेही भक्त सुखावले आहेत.
ठाणे दक्षिण ते रायगडात असलेल्या एका पंथाच्या लोकांनाही यामध्ये काही हरकत नाही. अर्थात केवळ समाजसेवा हाच त्यांचा उद्देश असल्यामुळे आणि विचारांची बैठक समाजसेवेची असल्यामुळे या महाराजांना सध्या तरी त्यात स्वारस्य नाही. पण काही भक्तगण यासंदर्भात बैठका घेउन महाराजांच्या भवितव्याबाबत बोलत आहेत. अर्थात उज्वल भवितव्याबद्दल स्वप्न पहात आहेत. अर्थात महाराजांनी आपल्या पंथाचा राजकीय कारणासाठी कोणीही लाभ उठवू नये यासाठी चांगलीच खबरदारी घेतली आहे. आपण समाजसेवा करतो तो समाजातील, माणसातील ईश्वर म्हणून करतो. समर्थ राष्ट्र उभारणीसाठी आपण कार्य करतो. आपण आतल्या अनुयायांच्या हृदयावर राज्य करतो. त्यामुळे असे स्वप्न कोणी पाहू नये याबाबत हे महाराज दक्षता बाळगून आहेत. पण तरीही भक्त आणि नमोभक्त हे महाराज आमचेच म्हणून त्यांच्या नावाचा टिळा लावायला लागले आहेत.
       तळकोकणाती जगदगुरू नाणिजचे महाराजांचे अनुयायांना तर स्वप्नच पडू लागली आहेत. आता आपले मेळावे, सामुदायिक विवाह,  धर्मांतर हे सगळं भविष्यात वर्षा बंगल्यावरच होणार अशी स्वप्न पडून प्रत्येकाच्या खिशाला वर्षा बंगल्यातील महाराजांचे फोटो असलेली पेनं लटकू लागली आहेत. आता महाराज म्हणून नाही तर मुख्यमंत्री म्हणून ते राजदंड घेउन विमानातून प्रवास करू शकतील अशी स्वप्न या भक्तगणांना पडू लागली आहेत. गणी गणी गणात बोते म्हणण्याऐवजी काहीजण गणी गणी वर्षात जाते असा जयघोष सुरू केला आहे.
परवाच ऐकलं, की या महाराजांनी आपलं शक्तीप्रदर्शन आता आणखी पॉवरफूल करण्याचे आदेश आपल्या अनुयायांना दिले आहेत. एक ग्रामसेवक का तलाठी ते व्हाया जगदगुरूपद मुख्यमंत्री हा प्रवास कसा असतो याविषयी चांगले लेखन कोण करू शकेल अशा काही लेखकांची परिषद घेतली होती म्हणे. म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांनी एका चपराशाचा मी मुख्यमंत्री कसा झालो हे जसे रंगवून सांगितले आहे तसेच हे महाराज मी एका ग्रामसेवकाचा मुख्यमंत्री कसा झालो याचे चरित्र आगावू लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे ज्या दिवशी हे महाराज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्याच दिवशी या चरित्राचे प्रकाशन करण्याचे फर्मान त्यांनी काढले आहे. या महाराजांना आपण मुख्यमंत्री नाही तर राजे झालो ेआहोत असेच वाटू लागले आहे. त्यामुळे चार दिवसांपूर्वी जे लोक महाराजांना नुसता नमस्कार करत होते, ते आता मंडपात प्रवेश करताना महाराजांचा विजय असो असे म्हणत जात आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे असेल तर योगी आदित्यनाथांप्रमाणे आपणही थोडी वादग्रस्त वक्तव्ये केली पाहिजेत, चर्चेत राहिले पाहिजे असे महाराजांना वाटत आहे. त्यामुळे येत्या काळात कोणी किती मुले जन्माला घालावीत याबाबत फर्मान कधी काढायचे यावर त्यांनी चिंतन करण्यास सुरूवात केली आहे.
पण एकुणच योगी आदित्यनाथांच्या मुख्यमंत्री होण्याने भगवा परिवार उत्साहाने सळसळत आहे. त्यात नाणिज संस्थानचे महाराज आघाडीवर आहेत. तर विरारचे बापू, रायगडचे समर्थकही आपापल्या महाराजांची नावे चर्चेत ठेवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भगवी लुंगी, भगवी धोतरं, टी शर्ट यांना चांगले मार्केट आले आहे. गळ्यात रूद्राक्ष, तुळशी आणि स्फटीकांच्या माळांच्या बाजारातही तेजी आली आहे. पण पुरोगामी महाराष्ट्रात इथे आम्हालाही वाव आहे हे दाखवण्यास भक्तगणांमध्ये स्पर्धा सुरू होताना आपल्याला पहावे लागेल. हा योग महाराष्ट्रात आलाच तर नवी घोषणा असेल दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रातही नरेंद्र.
-प्रफुल्ल फडके
8108454555

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: