मंगळवार, १४ मार्च, २०१७

भाजपने काढला 2013 चा वचपा


गोव्यात दुसर्‍या नंबरचा पक्ष असूनही सरकार स्थापन करून भाजपने काँग्रेसचा 2013 चा वचपा काढला आहे. गोवा आणि दिल्ली ही तशी एकेकाळची केंद्रशासीत प्रदेश होती. त्यानंतर ही दोन्ही राज्य झाली. एक पर्यटनाची राजधानी तर एक देशाची राजधानी.
2013 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुका या भाजपला बरंच काही शिकवून गेल्या होत्या. कारण त्याच निवडणुकीने भाजपची केंद्रात सरकार आणण्याची उमेद वाढवली होती. अण्णा हजारेंच्या ऑगस्ट 2011 च्या आंदोलनाचा फायदा उठवून आणि काँग्रेसवरच्या नाराजीचा फायदा उठवत केजरीवाल यांनी आपची स्थापना केली. काँग्रेसवरची नाराजी, अण्णांच्या आंदोलनाचा फायदा आणि 16 डिसेंबर 2012 ला झालेल्या निर्भया कांडाचा फायदा किंबहुना गैरफायदा उठवत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत विधानसभेत आव्हान उभे केले. काँग्रेसचे जाणे हे या निवडणुकीत निश्चित होते. भाजप सत्तेवर येणार हेही तितकेच निश्चित होते. पण ऐनवेळी अरविंद केजरीवाल यांनी मतविभागणी, नाराजी याचा फायदा उठवत दुसर्‍या क्रमांकाच्या जागा मिळवल्या.
भाजप हा सर्वात जास्ती जागा मिळवलेला एक नंबरचा पक्ष होता. 31 जागा त्यांनी मिळवल्या. केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने तब्बल 27 जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळवला होता. शीला दीक्षित दीर्घकाळ मुख्यमंत्री असुनही या पक्षाला दोन अंकी संख्या गाठता आली नव्हती. परंतु भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने आम आदमी पार्टीला पाठींबा देउन आपचे सरकार आणले.
यावेळी केजरीवाल यांनी बरीच नौटंकी केली. मेट्रोने जाउन आपण खूप साधे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. छोटे घर, मोफत पाणी असे अनेक विषय घेउन दिल्लीकरांच्या अपेक्षा वाढवल्या. परंतु यातले त्यांना काहीच करता आले नाही. ही विधानसभा पूर्णकाळ चालली नाही. लगेचच निवडणुका लागून आप पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवर येण्यात यशस्वी झाली.
भाजपने त्यावेळी मोठे युद्ध जिंकण्यासाठी छोटी लढाई हरणं योग्य ठरेल अशी भूमिका घेत केजरीवालांना दीड दिवसांच्या गणपतीप्रमाणे दिल्लीत बसवले आणि नंतर पाच वर्षांसाठी स्थापना केली. हे कोणाच्या लक्षात आले नाही. दिल्लीत जर 2013 ला भाजपने सरकार स्थापन केले असते, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत केजरीवाल यांचा आप लुडबुडला असता आणि भाजपला डोकेदुखी झाली असती. कारण आपचे उपद्रवमुल्य भाजपने ओळखले होते. या उपद्रवमुल्याचा वापर काँग्रेसने शस्त्र म्हणून केला होता. याच शस्त्राला भाजपने गोव्यात संरक्षण मंत्र्यांचे शस्त्र वापरून उत्तर दिले आहे.
दिल्लीत 2013 ला काँग्रेसने केलेल्या राजकारणाचा वचपा आत्ता भाजपने काढला आहे. दिल्लीत 2013 ला पहिल्या क्रमांकाचा पक्ष असूनही सरकार स्थापन करू न देण्याचा काँग्रेसचा डाव आत्ता भाजपने खेळला आहे. गोव्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असतानाही काँग्रेसला सत्तेपासून रोखायचे आणि भाजपने  सत्ता स्थापन करण्याची ही संधी भाजपने साधली. याला वचपा म्हणा, सूड म्हणा, धडा शिकवला म्हणा काहीही म्हणा पण राजकारणात जसा कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, तसेच राजकारणात असा मागचा वचपाही काढला जातो हे लक्षात घेतले पाहिजे. 2014 नंतर दिल्लीत झालेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला असला तरी त्याचाही वचपा गोव्यात काही महिन्यांनी निघेल यात शंकाच नाही. आज एक नंबरचा असलेला गोव्यातला काँग्रेस कधी गाळात जाईल हे सांगता येत नाही. याला म्हणतात राजकारण.
-प्रफुल्ल फडके/8108454555


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: