- आचार्य अत्रे अर्थात प्र. के. किंवा प्रल्हाद केशव अत्रे यांची आणि माझी ओळख झाली ती मी पाचवीत असताना. हे वाक्य तसे दचकायला होईल असे आहे पण या नावाची ओळख मला झाली ती पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकातील मोती या धड्यातून. प्राथमिक शाळेत त्यांचे काही लेखन येवून गेले असेल तर ते आठवत नाही, पण पाचवीत जी या नावाची ओळख झाली तिथपासून एक वर्षाआड ते बालभारतीत असायचेच. बालभारती, कुमारभारती आणि युवकभारती अशा जवळपास दहा वर्ष त्यांनी कधी प्र के अत्रे तर कधी केशवकुमार या नावाने साथ दिली. तेथूनच आचार्य अत्रे यांची पुस्तके वाचण्याची ओढ लागली.
- मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. आता आचार्य अत्रे यांचे निधन हे आमच्या जन्मापूर्वीच झालेले असले तरी लेखणीच्या सामर्थ्यावर ते अजरामर झाल्यामुळे त्यांचे साहित्यिक रूप मला सतत दिसत होते. म्हणजे मोतीपासून सुरू झालेल्या सोबतीने नंतर पाठ्यपुस्तका साने गुरूंजीवर लिहीलेला मृत्यूलेखही अजून आठवतो. मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे त्यांनी साने गुरूजींचे वर्णन केले होते. त्यानंतर कुमारभारतीत आम्ही कोण या केशवसुतांच्या कवितेचे विडंबन घेवून केशवकुमार म्हणून ते समोर आले. तर महाविद्यालयीन काळात लिंकनचा विनोद घेवून युवकभारतीत आले. तेव्हा आचार्य अत्रे म्हणजे विनोदी लेखक अशी मुलांमध्ये क्रेज होती. पण विनोद हा त्यांचा फक्त एक गुण होता. सर्व रसांमध्ये लिलया फिरणारे ते फार मोठे रसायन होते.
- अत्रे ह्यांचा जन्म सासवड, जिल्हा पुणे येथे झाला. त्याचे शिक्षण सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बी.ए.,बी.टी,टी.डी. पर्यंत झाले. पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक आणि पुढे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. नंतर काही काळ पुण्याच्या नगरपालिकेचे ते सदस्य होते. या विविध पेशांमध्ये काम करताना माणासांचे निरिक्षण करून त्यांना कथा, कादंबरी, नाटकांतून रंगवण्याचे महान कार्य त्यांनी केले.
- े १९३३ पासून नाट्य व चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला. १९४० मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते कार्यरत राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशी त्यांचे व्यावासायिक नाते राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी आपली कर्तुत्व आणि लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.
- साने गुरुजींची ‘श्यामची आई’ म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान आहे. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी श्यामची आई नावाचाच चित्रपट बनविला. या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले. इ.स. १९२३ साली अत्र्यांनी अध्यापन मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये रत्नाकर व इ.स. १९२९ साली मनोरमा, आणि पुढे इ.स. १९३५ साली नवे अध्यापन व इ.स. १९३९ साली इलाखा शिक्षक ही मासिके काढली. १९ जानेवारी १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले
- आचार्य अत्रेंचे कर्हेचे पाणी हे पाच खंडातील आत्मचरित्र आहे. याशिवाय चांगुणा, मोहित्यांचा शाप या कांदबरीचे लेखन त्यांनी केले. झेंडूची फुले व गीतगंगा हे कवितासंग्रह लिहिले. अशा गोष्टी अशा गंमती, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा ही कथासंग्रहाची पुस्तके त्यानी लिहिली.
- याशिवाय अध्यापक अत्रे, आषाढस्य प्रथम दिवसे, इतका लहान एवढा महान, केल्याने देशाटन, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग-२, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले, मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो? ह्या त्यांच्या काही उल्लेखनिय कलाकृती.
- आचार्य अत्रे यांनी प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबन काव्याची परंपरा उपयुक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा (१९३५) या संग्रहात आहे.
- नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या २७ व्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय ३८ वे नाट्यसंमेलन, बेळगाव, १० मराठी पत्रकार-संमेलन आणि बडोदा, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली आहेत.
- अत्र्यांनी केलेल्या विविध विषयांवर लेखनात अनेक चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश आहेत.
- आचार्य अत्रे यांची नाटके तर अजरामर आहेत. लग्नाची बेडी, मोरूची मावशी आणि तो मी नव्हेच या नाटकांनी तर पन्नास वर्ष मराठी रंगभूमीवर धूमाकूळ घातला. अनेक अभिनेते, दिग्दर्शकांना ओळख दिली.
मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५
आचार्य अत्रे
व्यक्ति मारून विचार मरत नाहीत
- डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे आणि त्यानंतर आता डॉ. मल्लेशप्पा कलबुर्गी या ज्येष्ठ पुरोगामी विचारवंतांची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली आहे. या देशात हा नवीन काय प्रकार रूजू लागला आहे आणि विचारवंतांचे विचार दडपण्याची ही कुठली नवी प्रथा रूजते आहे असा प्रश्न यामुळे पडला आहे.
- कलबुर्गी हे अत्यंत विद्वान, पंडित होते. कन्नड शीलालेख, तसेच वचन साहित्याचे ते गाढे अभ्यासक होते. ‘मार्ग-४’ या संशोधनात्मक लेखांच्या संग्रहासाठी त्यांना २००६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. थोर संशोधक म्हणून त्यांची ख्याती होती. डॉ. नरेंद्र दाभोळकरांप्रमाणेच तेही अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचे खंदे पाठीराखे होते. अशा व्यक्तीची भ्याडपणाने हत्या होणे ही बाब अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे. त्यामुळे विचारांचा लढा विचारांनी देण्याच्या काळात तो अविचाराने देण्याचा जो प्रकार या देशात रूजतो आहे, राज्यात रूजतो आहे तो अत्यंत घातक असा आहे. पुरोगामी विचारांमुळेच त्यांची हत्या झाली, ही संपूर्ण देशाला लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे प्रतिगाम्यांची दहशत या देशात वाढत असेल तर हा नवा तालिबानचा प्रकार घडताना दिसत आहे असेच म्हणावे लागेल. हा दहशतवाद रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
- डॉ. दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्याप्रमाणेच कलबुर्गी यांना खुनाबाबतच्या धमक्या देण्यात येत होत्या. त्यांना काही काळ पोलीस संरक्षणही होते. मात्र अलीकडेच त्यांनी हे संरक्षण नाकारले होते. नेमकी ही संधी साधून अत्यंत भेकडपणाने येऊन, आपण विद्यार्थी आहोत, असे सांगून घरात शिरून हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. अतिशय उद्वेगजनक आणि आश्चर्यकारक अशी ही घटना आहे. याचा संपूर्ण देशाने निषेध केला पाहिजे. मात्र, कलबुर्गी यांच्या हत्येमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे प्रतिगाम्यांशी सुरू असलेला लढा हा केवळ महाराष्ट्र या एका राज्यापुरता मर्यादित नसून पुरोगामी विचारवंतांवर होणारे हल्ले आता इतर राज्यीय प्रकरण बनलेले आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येनंतर हे प्रकार फक्त महाराष्ट्रात घडत आहेत असे वाटत होते, तो समज आता खोटा ठरत आहे. हा रोग स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूपेक्षा भयंकर वेगाने सर्व देशभर पसरत आहे, ही चिंतेची बाब आहे.
- अशा घटनांच्या मागे कोणीतरी ‘मास्टर माईंड’ आहे. त्याने एक हिटलिस्ट तयार केली असून त्यानुसार या गोष्टी सुरू आहेत हे निश्चित. त्यामुळेच आता केंद्र सरकारने सीबीआयसारख्या संस्थांच्या हातात हे प्रकरण देऊन हल्लेखोरांचा आणि त्यामागच्या सूत्रधारांचा शीघ्रगतीने शोध घेतला पाहिजे. तसेच राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाने हे प्रकरण हाती घेतले पाहिजे. कारण हे प्रकरण दहशतवाद्यांचेच आहे. हे प्रतिगामी दहशतवादी आहेत. तेव्हा त्याची चौकशी सीबीआयमार्फत व्हायला हवी. हे जर फार मोठे जाळे वा षड्यंत्र असेल तर अशा तर्हेच्या घटना भविष्यातही घडत राहण्याची शक्यता आहे.
- ही गोष्ट लोकशाही देशासाठी चिंताजनक आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने आता याची जबाबदारी घेतली पाहिजे. यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे. कलबुर्गी हे वचन साहित्यावरील महापंडित होते. कवी, नाटककार, समीक्षक आणि साक्षेपी इतिहासकार अशी त्यांची कर्नाटकात ख्याती आहे. कलबुर्गी यांनी काहीकाळ कर्नाटकातील हंपी विद्यापीठाचे कुलगुरूपदही भूषवले होते. वीरशैव पंथाबद्दलचा त्यांचा अभ्यास हा अत्यंत गाजलेला आणि जागतिक दर्जाचा आहे. त्यांनी याबाबत केलेल्या प्रयत्नांना कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळू लागला होता. त्यामुळे त्या पंथातील जी जुनाट विचारांची मंडळी आहेत त्यांना असे विचार सहन होत नव्हते. त्यांनी यापूर्वीही कलबुर्गी यांना त्रास दिला होता. त्यावर ‘माझ्या कुटुंबियांच्या जीवित रक्षणासाठी मी यापुढे वचन साहित्यावर काही लिहिणार नाही’ असे कलबुर्गी यांनी जाहीर केले होते.
- म्हणजेच तामिळनाडूमधील पेरुमल मुरुगन यांच्याबाबत जे झाले तेच कलबुर्गी यांच्या साहित्याबाबत घडले होते. मुरुगन यांनी ज्याप्रमाणे साहित्यिक मरण पत्करले होते तसेच कलबुर्गी यांनी केले होते. त्यामुळे हा दहशतवाद पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा आहे. हा झगडा फार जुना आहे. इतिहासाच्या प्रत्येक निर्णायक वळणावर एक गोष्ट निदर्शनास येते की, ज्या-ज्यावेळी पुरोगामी विचार जनमानसाची पकड घेऊ लागतात तेव्हा प्रतिगामी शक्ती अधिक अस्वस्थ होतात आणि हिंसाचाराचा मार्ग स्वीकारतात. पुरोगामी विचार मांडणार्या व्यक्तींचा किंवा संबंधित समूहाचा नाश करणे हे त्यांचे उद्दिष्ट बनते. गेल्या तीन वर्षांपासून भारतातही या प्रतिगामी शक्ती पुरोगामी शक्तींच्या वाढत्या प्रभावामुळे चिडून हिंसाचाराचा मार्ग निवडत आहेत. याला आळा घालण्याचे काम सध्याचे सरकार कसे करेल याबद्दल साशंकता आहे. त्यामुळेच आता देशातील पुरोगामी विचारांच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन एकत्रितपणे, संघटितपणे याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे. विवेकशील विचारांकडे नैतिकतेचा आणि मानवतेचा पाया असतो म्हणूनच असे विचार कधीच नष्ट होत नाहीत. माणूस वा व्यक्ती मारून विचार मरत नाहीत, तर पुरोगामी विचार हे पसरतच असतात. उलट अशा घटनांनंतर या विचारांना अधिक बळ येते ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आपण माणसाबरोबर त्याच्या विचारांचीसुद्धा हत्या करू शकतो या भ्रमात प्रतिगामी प्रवृत्तींनी राहू नये.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)