मंगळवार, ३१ डिसेंबर, २०२४

दंड!


‘शांतपणे गुपचूप बैस,’ एक जण दुसºयाला समजावत होता, पण त्याचे समाधान होत नव्हते. तो म्हणत होता की, ‘पण मला भीती वाटतेय रे’. ‘टेन्शन घेऊ नकोस, मी सांभाळतो सगळे’, पहिल्याचे दुसºयाला धीर देणे चालूच होते, पण तिसरा अधिकच घाबरत होता, किंबहुना पहिल्याच्या समजावण्याने तो अधिकच टेन्शनमध्ये येत होता. शेवटी अखेरचे समजावत त्याला पहिला म्हणाला की, ‘अरे, काय होईल फार फार तर? जरा सर्व्हायव्ह करायला शिक. मुंबई आहे ही. जास्तीत जास्त काय, तर पकडले जाऊ. फासावर तर देणार नाही ना तो? दंड भरू.’ ‘पण कुणी पाहिले तर? बाकीचे कसे बघतील आपल्याकडे?’ त्याने शंका विचारली, तसा पहिला म्हणाला की, ‘ही मुंबई आहे, इथे कुणालाही कुणाकडे बघायला वेळ नाही आणि अशी वेळ प्रत्येकावर कधी ना कधी आलेली असतेच.’


आता त्याला थोडा धीर आला. लोकल धावत होती. एकेक स्टेशन पुढे जात होती. लोकलची धडधड आणि त्याच्या छातीतील धडधड वाढतच होती. शेवटी पहिला पुन्हा एकदा म्हणाला की, ‘लहानपणी चोर-पोलीस हा खेळ कधी खेळला नाहीस का?’ खिन्न हसत तो म्हणाला, ‘खेळायचो ना, पण मी लगेच पकडला जायचो.’ त्यावर हसत पहिला म्हणाला, ‘सामान्य पापभिरू माणसाचे असेच असते. किरकोळ चूकही त्याला खूप मोठे पाप वाटते आणि तो त्यातच पकडला जातो, पण आपण दंड भरू आणि मोकळे होऊ.’

लोकलमधला हा संवाद लक्ष वेधून घेणारा होता. गर्दीच्या वेळी तिकीट काढायचे राहून गेले आणि ते दोघे पटकन गाडीत चढले होते. त्यानंतर त्याच्या लक्षात आले की, अरेच्चा! तिकीट काढायचे राहूनच गेले. त्यापैकी एकाचा पास होता. त्यामुळे तो भराभरा गाडीत चढला, त्याच्यापाठोपाठ दुसराही चढला. त्याच्या लक्षात आले नाही की, तिकीट काढायचे आहे. अनवधानाने झालेली चूक, पण त्याचे टेन्शन त्याने घेतले होते, पण त्याला समजावताना लहानपणीच्या चोर-पोलीस खेळाची आठवण करून दिली होती त्याच्या मित्राने.


खरेच मुंबईतील लोकल आणि त्यातील फुकटे प्रवासी हा चोर-पोलिसाचाच खेळ असतो. या खेळात बहुतेक सर्वांनीच कधी ना कधी भाग घेतलेला असतो. अगदी भल्याभल्यांनीही. त्यात कुठे चोरी करण्याचा वाईट हेतू असतो असे नाही, पण कळत-नकळत विदाऊट तिकीट जाणे भाग पडते आणि नेमके पकडले जाण्याची भीती असते. त्यामुळे आपण पकडले जाणार नाही यासाठी घेतली जाणारी खबरदारी म्हणजेच हा चोर-पोलीस खेळ. मी एकदाही विदाऊट तिकीट प्रवास केला नाही, असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही, पण पकडला तर चोर, नाही तर राजाहून थोर अशी अवस्था असते. रेल्वेचे टीसी नेमक्या माणसांना कसे पकडतात हे न उलगडणारे कोडे आहे. त्यातून आजकाल टीसी वेगळेच दिसतात. पूर्वी टीसी लोकलमधूनही हिंडायचे, पण आता गर्दीत चेकिंग करणे सोपे नसल्याने शक्यतो ते प्लॅटफॉर्मवरच सापळा लावून बसलेले असतात. पूर्वी काळ्या कोटामुळे पटकन टीसी कुठून येतोय हे कळायचे आणि दुसºया दाराने कलटी देणे सोपे जायचे, पण आजकाल पांढºया शर्टमुळे टीसी चटकन ओळखूच येत नाही. एकदम पकडल्यावरच समजते, पण ते अचूकपणे विदाऊट तिकीट प्रवाशांना पकडतात हे नक्की. ते ज्यांना अडवतात, त्यापैकी बहुतेक जणांकडे तिकीट नसते, कुणी जुने तिकीट दाखवतो, कुणाचा पास संपलेला असतो, कुणी तिकीटच काढलेले नसते, कुणी अलीकडच्या चार स्टेशनचे तिकीट काढलेले असते, म्हणजे सीएसएमटीला उतरणाºयाकडे दादरपर्यंतचेच तिकीट असते. असे अनेक प्रकारचे विदाऊट तिकीट पकडले जातात. मग त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो, म्हणजे चोर-पोलीस हा खेळ इथे सतत चालूच असतो.

प्रत्येकाने त्यात कधी ना कधी भाग घेतलेला असतो. त्यामुळे कधी कधी वाटते की, जर दीवार हा चित्रपट पुन्हा काढला, तर त्या अमिताभच्या-विजयच्या हातावर ‘मेरा बाप चोर हैं’ असे न लिहिता ‘हम सब चोर हैं’ असे गोंदवले जाईल. विदाऊट तिकीट प्रवाशांची एक मानसिकता असते. टीसीला चुकवल्यानंतर फार मोठा विजयी आनंद त्यांच्या चेहºयावर असतो. सुटलो बुवा म्हणून स्टेशनमधून बाहेर पडतात. काही जण अत्यंत हिशोबी असतात. नेहमी विदाऊट तिकीट प्रवास केल्यावर एखादेवेळी पकडलो गेलो आणि दंड भरला, तर काही फरक पडत नाही, असे त्यांचे मत असते. हे निर्ढावलेले प्रवासी असतात, पण कधी तरी अनवधानाने विदाऊट तिकीट प्रवास करणाºयांचे छातीचे ठोके रेल्वे इंजिनसारखे धडधडत असतात, हे नक्की. पकडल्यावर काय अपमान होतो याची त्यांना भीती असते, म्हणजे पकडून दंड भरण्यापेक्षा आपण विदाऊट तिकीट पकडले गेलो आणि आसपासचे लोक आपल्याला पाहत आहेत, यानेच त्यांना मेल्याहून मेल्यासारखे होते, म्हणजे आपण जेव्हा घसरून पडतो, तेव्हा पडल्याचे दु:ख किंवा लागल्याचे दु:ख नसते, तर कोणी पडल्यावर हसले की त्याचे दु:ख असते. तसेच इथे होते. आपली चूक आहे, आपण दंड भरायचा, पण त्याने अडवून दंड भरा म्हणताना बाकीचे ज्या नजरेने बघतात त्याचे टेन्शन असते. काय सुशिक्षित माणूस आहे, पण विदाऊट तिकीट जातो? काय बाई आहे, चांगल्या घरची दिसते, पण तिकीट नाही काढले? या तरुणांना तिकीट काढायचेही भान नाही का? अशा असंख्य प्रतिक्रिया येणार. तशीच आपल्याबाबत असणार याची भीती असते. कधी कधी अनवधानाने आपण विदाऊट तिकीट प्रवास करतो. पास काल रात्री बारा वाजता संपला, ते लक्षातच नाही आणि थेट रोजच्याप्रमाणे गाडीत बसलो. गाडीत सहज कोणी तरी आज अमूक एक तारीख आहे म्हणतो आणि आपल्या लक्षात येते, अरे बापरे, पास संपलाय... आता पकडले गेलो तर? कधी शेवटची गाडी असते, त्यानंतर लवकर गाडी नसते, कधी नेहमीची गाडी पकडली नाही आणि लेटमार्क लागला तर? या काळजीने रांगेत उभे न राहता थेट गाडीत घुसले जाते. अनेक कारणांनी केव्हा ना केव्हा तरी प्रत्येकाचा विदाऊट तिकीट प्रवास झालेला असतोच. अशाच प्रकारचा तो आज चिंतेत होता.


सीएसएमटीला गाडी थांबली, तसा तो निश्चयानेच पुढे गेला. समोर टीसी होताच. टीसीच्या दिशेनेच तो जात होता. निर्धार एकच केला होता, त्याला आपण होऊन सांगायचे की, दंड भरतोय, तिकीट नाहीये. टीसीच्या दिशेने तो जात असतानाच टीसी त्याच्याकडेच पाहत होता, पण तो ठाम होता. मग टीसीच वेगाने पुढे आला आणि त्याने झेपावून मागच्या माणसाला पकडले. अरेच्चा, आपण सुटलो? आता तो पाहत राहिला काय होते पुढे ते? टीसीने त्याला नेहमीचा पासधारक आहे म्हणून दुर्लक्षिले होते, पण त्याच्या मागून येणाºया विदाऊट तिकीट प्रवाशाला पकडले होते. आता तो पकडला गेलेला तरुण गयावया करू लागला. ‘साहेब, मी गरीब आहे. मला महत्त्वाच्या कामाला जायचे होते.’ ‘दंड भरा प्रथम...’ टीसीने सांगताच तो काकुळतीला येत म्हणाला, ‘ एवढे पैसे नाहीत हो माझ्याकडे.’ हे पाहून सुटलेल्या विदाऊट तिकीट प्रवाशाला वाईट वाटले. आपण सुटलो, पण हा पकडला गेला आहे. तो तसाच मागे वळला आणि म्हणाला, ‘साहेब, नेहमीचा सभ्य तरुण आहे तो. त्याला मी ओळखतो. त्याचा दंड मी भरतो. हे घ्या पैसे, त्याला सोडा. त्याच्या नोकरीचा प्रश्न आहे. नसतील त्याच्याकडे. मदतीसाठी धावलेल्या त्या विदाऊट तिकीट प्रवाशाच्या पाठीवर हात ठेवत टीसी म्हणाला,’ ‘ठीक आहे, सोडतो त्याला. तुम्हाला कशाला दंड?’ ‘नाही, रेल्वेचे नुकसान नको, हवे तर किमान तिकिटाचे पैसे तरी घ्या,’ असे म्हणत पन्नासची नोट टीसीच्या हातात टेकवून त्या तरुणाला घेऊन तो विदाऊट तिकीट माणूस निघूनही गेला. आपल्याला दंड पडला नाही, म्हणून त्याने वेगळ्या मार्गाने दंड भरला होता!

प्रफुल्ल फडके/अन्वय


९१५२४४८०५५

२0२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल



पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे उद्भवलेल्या भौगोलिक राजकीय आव्हानांना न जुमानता भारतीय अर्थव्यवस्था २०२४ मध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहिली आहे. तांत्रिक प्रगती, तंत्रज्ञान, बँकिंग, नवीकरणीय ऊर्जा आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या धोरणात्मक उपाययोजनांद्वारे भारत जागतिक आर्थिक क्षेत्रात एक प्रमुख खेळाडू म्हणून आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.


मजबूत परकीय चलन साठा आणि विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी प्रवाह भारतीय अर्थव्यवस्थेसाठी इंजिन म्हणून काम करत असताना, वाढती चलनवाढ, घसरणारा खप, आर्थिक कर्ज आणि घटलेला जीडीपी वाढीचा अंदाज यामुळेही मोठी चिंता निर्माण झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचा दर्जा मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारताला सध्याच्या आर्थिक परिस्थितीत २०२५च्या धोरणांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

ग्रामीण भागातील गुंतवणूक, उपभोग आणि सुधारणांमुळे २०२५ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत आधार निर्माण होईल. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून २०२५ पर्यंत देशांतर्गत मागणी मजबूत राहील. शहरी तसेच ग्रामीण भागातून मागणीत सकारात्मक कल दिसून येत आहे.


जून २०२४ मध्ये भारताच्या जीडीपीमधील खासगी अंतिम उपभोग खर्च ५७.९ टक्क्यांवरून ६०.४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. २०२३ मध्ये ग्रामीण भागातील ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी २.२ टक्क्यांवरून ६.२ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सांख्यिकी मंत्रालयाच्या मते, शहरी-ग्रामीण मासिक दरडोई खर्चातील अंतर २०११-१२ या आर्थिक वर्षातील ८४ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये ७१ टक्क्यांवर घसरले. २०२३-२४ मध्ये हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ग्रामीण भागातील उपभोग वाढीमुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात असमानता कमी झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसºया तिमाहीत म्हणजेच जुलै-सप्टेंबरमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ५.४ टक्के झाली, जी पहिल्या तिमाहीतील ६.७ टक्के वाढीपेक्षा कमी आहे. तिसºया तिमाहीत अर्थव्यवस्था पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे. सीआरआयएसआयएलच्या ताज्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारताचा विकास दर ६.५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या भारताकडे काम करणाºया तरुणांची सर्वात मोठी फौज आहे.


२५ ते ५४ वयोगटातील महिलांमधील श्रमशक्तीच्या सहभागाचे प्रमाणही वाढले आहे. तथापि, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आणि मेक इन इंडिया मोहिमेसह अनेक सरकारी प्रोत्साहने असूनही, उत्पादन क्षेत्राला अपेक्षित लाभ मिळवण्यात यश आलेले नाही. यासाठी आपल्याला उत्पादन क्षेत्राच्या दीर्घकालीन स्वरूपाकडे अधिक लक्ष देऊन संरचनात्मक सुधारणांकडे वाटचाल करावी लागेल.

धोरणकर्त्यांना गुंतवणुकीत वैविध्य आणण्यावर भर द्यावा लागेल, कारण आतापर्यंत गुंतवणूक ही मुख्यत: स्टील, यंत्रसामग्री, रसायने यांसारख्या अवजड उद्योगांमध्ये झाली आहे. वैविध्यपूर्ण उद्योगांना चालना दिल्याने देशांतर्गत मागणीही झपाट्याने वाढेल. नवोन्मेषाची संस्कृती, शैक्षणिक-उद्योग भागीदारी आणि जागतिक बाजारपेठेतील प्रवेशाचा विस्तार करून भारत २०२५ मध्ये स्वत:ला जागतिक इनोव्हेशन पॉवर हाऊसमध्ये बदलू शकतो.


सन २०२४ मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठल्यामुळे भारताची वित्तीय बाजारपेठ जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. ही तेजी २०२५ मध्येही कायम राहू शकते, यासाठी परकीय चलन बाजारात स्थिरतेवर काम करताना आपल्या मालाची निर्यात वाढविण्यावर अधिक काम करावे लागेल. तसेच, गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी वित्तीय शिस्तीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

सन २०२५ मध्ये सरकारचे प्राधान्य चलनविषयक धोरणात किरकोळ शिथिलता देऊन महागाईचा दबाव कमी करणे हे असेल. भांडवल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने कमी आणि मध्यम उत्पन्न गटांच्या क्रयशक्तीला चालना मिळेल. जन धन, आधार आणि मोबाइल अंतर्गत उघडलेल्या खात्यांमध्ये २.३२ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. सध्या ई-व्यवहार १३४ अब्ज रुपयांपर्यंत वाढले आहेत, जे सर्व जागतिक डिजिटल पेमेंटच्या ४६ टक्के इतके आहे.


२०२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल अशी अपेक्षा आहे. एका दशकापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील ११ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. जपानमधील संभाव्य व्याजदरात वाढ, अमेरिका आणि चीन यांच्यातील संभाव्य टॅरिफ युद्धासह जागतिक भू-राजकीय तणाव भारताला जागतिक व्यापार आणि उत्पादन क्षेत्रात मध्यवर्ती खेळाडू बनण्याच्या नवीन संधी उघडू शकतात.

झपाट्याने बदलत असलेल्या भू-राजकीय परिस्थितीत पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण करण्यासाठी धोरणात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करून, चायना प्लस वनचा धोरणात्मक फायदा घेणे, कुशल मनुष्यबळाचा वापर करणे इ. यासाठी मुक्त व्यापार करार आणि रुपयाचे आंतरराष्ट्रीयीकरण झपाट्याने पुढे नेण्याच्या उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. एकंदरीत, शहरी उपभोगातील वाढ, सेवा क्षेत्रातील वाढ आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणुकीकडे सततचा कल यामुळे भारतीय अर्थव्यवस्था २०२५ मध्ये मजबूत वाढीसाठी सज्ज आहे. ही भारताची कामगिरी अत्यंत समाधानकारक असणार आहे. देशाचा नावलौकिक वाढवणाºया या कामगिरीला पुढे नेण्यासाठी नवीन वर्षात विरोधकांनी शत्रुत्व सोडून सरकार बरोबर सहकार्याची भूमिका घेतली तर आपण आणखी पुढे जाऊ.